Thursday, April 3, 2008

50 k? नॉट ओके !- Column in Saptahik Sakal

हो. कमावतो आम्ही पन्नास हजार रुपये महिन्याला. माहिती आहे आम्हाला की काही जणांचा वर्षभराचा पगार असतो एवढा. पण याचा अर्थ असा मुळीच नाही, की आम्हाला प्रश्नच नाहीत. आमचे काही इश्यूज नाहीत.

उदाहरणं देतो चला !

परवा लंच साठी पॅन्ट्रीत गेलो. जेवण झाल्यावर हात पुसावे म्हटलं तर टेबलवर टिश्यू पेपर्सच ठेवलेले नाहीत. होतं कधीतरी. म्हटलं संपले असतील. म्हणून उठून वॉशरुममध्ये जाऊन हात धुतले... तर तिकडेसुद्धा हात पुसायला टिश्यू पेपर्स नाहीत. आता तिथे हॅन्ड ड्रायर होता म्हणून ठीक आहे. पण नसता तर ? आणि असं 1-2 दिवस नाही.. चक्क आठवडाभर सुरू हो ! मग विचार केला की आता मात्र काहीतरी केलंच पाहिजे. लिहीली एक मेल सर्वांना...

“Dear Colleagues,

टिश्यू पेपर्स शिवाय जगाची कल्पना केली आहे का कधी ? जग सोडा. पण टिश्यू पेपर्सशिवाय ऑफिसची कल्पना केली आहे का ? आम्हाला माहिती आहे, की आपल्या ऑफिसमधले सर्व जण गेला आठवडाभर या त्रासाचा अनुभव घेत आहेत. आपल्या एडमिन (प्रशासन) ला याचे काहीच कसे वाटत नाही ?

म्हणूनच आपण सर्वांनी पुढचा सोमवार हा बहिष्कार दिवस” म्हणून पाळायचा आहे. तर आपला एक्शन प्लॅन असा-

दिवस- सोमवार
स्थळ- ऑफिस
योजना- सर्वांनी ऑफिसला येताना आपला शर्ट, कुरता, टी-शर्ट ला सेफ्टी पिन ने रुमाल लावून यायचं. एडमिन जोपर्यंत आपल्याला टिश्यू पेपर्स देत नाही, तोपर्यंत असं रोज करायचं.

या विषयावर अजून काही मतं असल्यास जरुर सांगा. याच प्रकारचे, work environment (कामाचे वातावरण) शी निगडित अजूनही काही genuine प्रश्न असल्यास तेही आम्हाला जरुर कळवा.

Thanks
---आयोजक”

या मेलला सर्वच जणांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अहो मिळणार नाही तर काय. प्रश्नच तसा genuine होता ना. इतकंच नाही तर लोकांनी असे अजून कितीतरी प्रश्न समोर आणले.


त्यातले काही प्रतिनिधिक प्रश्न खालील प्रमाणे---

ऑफिसमध्ये असलेल्या जिममधील ए.सी. चे टेम्परेचर 22 च्या खाली येत नाही.
गेला महिनाभर 9 व्या मजल्यावर असलेल्या व्हेंडिंग मशीन मधून लेमन टी येत नाही. त्यामुळे आम्हाला सातव्या मजल्यावरुन लेमन टी आणावा लागतो. परिणामी आमच्या कामाचा बराच वेळ जातो.
गाणी ऐकण्यासाठी ऑफिसकडून देण्यात येणार्या हेडफोन्सचा दर्जा चांगला नाही.
आमचा अटायर आलवन्स वाढवून मिळावा. सध्याच्या अलावन्स मध्ये दर महिन्याला साजर्या होणार्या विविध डेजची गरज भागत नाही. (उदाः पिंक डे, व्लॅक-व्हाईट डे, इत्यादी.)
कॉमन पॅन्ट्रीमध्ये असणारे पूल चे टेबल एका बाजूने कलले आहे. कृपया ते लवकरात लवकर दुरूस्त करुन घ्यावे.
ऑर्कुट सारखी कंपनीने बॅन केलेली पोर्टल्स, किंवा याहू, गुगल टॉक सारख्या बॅन केलेल्या मेसेंजर्सचे प्रोक्सी कळवण्याची सोय करावी.

हे आणि असे कितीतरी प्रश्न समोर आले. आता तुम्हीच सांगा... हे प्रश्न काय प्रश्न नाहीत ?



हा सगळा दिखाऊपणा, नखरेलपणा वाटतोय ना ? हे सगळं धक्कादायक किंवा धोकादायक वाटतंय ना ? पण हे असंच आहे. आई-वडिलांना रिटायरमेंटच्या वेळेस सुद्धा मिळत नव्हता, एवढा पगार पहिल्याच नोकरीमध्ये आम्हाला मिळतो. कधी कधी विचार करताना असं वाटतं की हा खरंच इझी मनी आहे का ? याचं समर्थन कसं बरं करायचं ? असे काही प्रश्न मनात घेऊन समव्यवसायी काही मित्रांशी चर्चा केल्यावर काही मुद्दे जाणवले. ते सांगवेसे वाटताहेत.

इथे काम करणाऱ्या अनेक जणांच्या मते, आपण गुंतवत असलेला बेसुमार वेळ, आणि त्या जोडीला येणारे अनेक प्रकारचे आरोग्याशी निगडित असणारे प्रश्न... .याची किंमत म्हणून तो गलेलठ्ठ पगार असतो. दुसरं म्हणजे. It is all about business. शेवटी प्रत्येक काळामध्ये असा एखादा व्यवसाय एकदम चलतीमध्ये येतच असतो. तसा या काळामध्ये सॉफ्टवेअरचा व्यवसाय आहे. उद्या तो असेलंच असं सांगता येत नाही. कायमची अशाश्वती हे सुद्धा या इंडस्टीचं एक महत्वाचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे, या अशाश्वतीची सुद्धा ही किंमत असते. या इंडस्ट्रीची सगळीच व्यवस्था डॉलर इकॉनॉमी आहे. त्यामुळे अर्थातच सगळी गणितं डॉलरच्या पटीत वाढतात. अशा सर्व कारणांमुळे बाहेरुन लोकांना फक्त या मध्ये मिळणारा पगराचा मोठा आकडाच दिसतो. कितीतरी लोकांना तर सॉफ्टवेअर मध्ये काम करणारे लोक आणि इतर व्यवसायांमध्ये असणारे लोक यांच्यामधला फरक अगदी साक्षर - निरक्षर मधल्या फरकासारखा वाटतो. त्यामुळेच सॉफ्टवेअर जीवनशैली ही आपल्याला न परवडणारी जीवनशैली असा समज होत चालला आहे.

“तुमचं काय बुवा”... असं वाक्य या इंडस्ट्रीमधल्या लोकांना नवीन नाही.
एका मैत्रिणीने सांगितलेला तिचा अनुभव तर अगदीच बोलका होता. तो तिच्याच शब्दात असाः

---------------------------------------------------------------------
मला सॉफ्टवेअरमध्ये कामाला लागून आता 5 वर्ष झाली. या 5 वर्षांमध्ये मी साधारण 4 वेळा अमेरिका, जर्मनी, इंग्लंड अशी फिरुन आले. नेहमीच परत येताना मी माझ्या नातेवाईकांसाठी काही ना काही आणत होते. यावर्षी दिवाळीमध्ये मी गावी गेले, तेव्हा माझ्या आजीसाठी माझ्या चुलत भावाने छान स्वेटर आणला होता. स्वेटर बघून माझी आजी... जिने वयाची सत्तर वर्ष इथे काढली आहेत... ती काय म्हणाली असेल?

“मला हा असला नेपाळ्याकडचा स्वेटर देत नको जाऊ बाबा. त्याची लोकर भारी टोचते अंगाला आणि त्याची घडी पण नीट होत नाही. मला आपला नेहा पाठवते तो अमेरिकेकडचाच स्वेटर बरा वाटतो. छोटी घडी होते आणि ऊबदार आणि मऊसुद्धा आहे.”
---------------------------------------------------------------------


संपूर्ण आयुष्य इथे काढलेल्या, अमेरिकेचं कधी तोंड देखिल न बघितलेल्या या आजीबाईंची जीवनशैली आणि त्यांच्या अपेक्षा जर त्यांच्या सॉफ्टवेअर मधल्या नातीमुळे इतक्या उंचावत असतील, तर स्वतः त्या नातीची जीवशैली तशीच मध्यमवर्गीय राहावी अशी अपेक्षा करता येईल?

पण बर्याच जणांच्या मते जीवनशैलीमधल्या या बदलाचा अर्थ कुटुंबातल्या कितीतरी जणांना लावताच येत नाही.

साधारण 10 वर्षापूर्वीपर्यंत मध्यमवर्गीय घरांमध्ये मुलांना शिक्षण दिलं, की त्यांनी लवकरात लवकर बऱ्यापैकी कमवायला लागावं आणि आई-वडिलांना म्हातारपणी आधार द्यावा इतपत अपेक्षा मुलांकडून असायची. रिटायरमेंटनंतर फंड आणि ग्रॅच्युटी च्या रकमेला मुलींचे लग्न, नवीन घर, किंवा जुन्या घराचे नूतनीकरण अशा वाटा असायच्या.

याच्या बरोबर विरुद्ध... कामाला लागून 4-5 वर्ष होत नाहीत तोवर आमचे, आमच्या मित्र-मैत्रिणीचे फ्लॅट्स, कार, हे सगळं झालेलं असतं. हे सगळं एकदा झालं, की मग त्याच्या जोडीला येणारी जीवनशैली मेंटेन करण्याचा खेळ सुरू होतो. एसी कारमध्ये बसून ऑफिसला जायचं, एसी ऑफिसमध्ये बसायचं, दुपारी लंचसाठी एसी हॉटेलमध्ये जेवायला जायचं, मॉल्समध्ये शॉपिंग करायचं, वीकएंडसाठी सुद्धा असंच एखादं अप-मार्केट ठिकाण गाठायचं आणि मग ऑफिसमध्ये टिश्यू पेपर्स नसण्यासारखी पॉमेरियन दुःख कुरवाळायची.

आम्ही जितके जास्त पैसे कमावतो, तितकी जास्त बचत होते का ? वरवर बघताना असं वाटतं, की चला पूर्वी मी महिन्याला केवळ दहा हजार कमवत होते आणि तरीही 4 हजार वाचवू शकत होते. म्हणजे त्याच प्रमाणात आता मी महिन्याला पन्नास हजार कमावले, तर 20 हजार वाचवू शकेन. पण असं तर होत नाही ना. वर सांगितलेल्या उदाहरणामधल्या आजीबाईंप्रमाणे अनेक सोयी केव्हा आपल्या गरजा होऊन बसतात, कळतच नाही. आणि मग फिनिश लाईनच्या जवळ जातोय असं वाटेपर्यंतच पुन्हा एकदा ती लांब जाते आणि पुन्हा एकदा आम्ही धावायला सज्ज होतो. माहीती असतं, की हे धावणं काही खरं नाही आण कुठवर धावणार आपण. आपला दम संपला की थांबावं लागणार. म्हणून मग आम्ही असं ठरवतो, की आत्ता आपलं वय आहे आणि दमसास आहे तोवरच धावून घ्यावं. जितना बटोर सकते हो, बटोर लो!

चाळीशीला रिटायर होण्याची स्वप्नं बघणारे आम्ही म्हणूनच म्हणतो, 50 k is not ok!

1 comment:

Unknown said...

tu khoop sadhe saral lihites, konalahi kahihi prove karaichee ghai naslele,
chhan........
Amit khot
9930366685