Thursday, April 3, 2008

Column in Saptahik Sakal

जग जवळ येणं म्हणजे नक्की काय हे आपल्याला खऱ्या अर्थानी समजलं आय.टी.चं हे क्षेत्र अगदी आपल्या घरापर्यंत योऊन ठेपल्यापासूनच. आपल्या घरातली एखादी जवळची
व्यक्ती परदेशी गेल्यामुळे,तिच्याशी संपर्क ठेवण्यासाठी अपरिहार्यपणे इंटरनेट शिकून घ्यायची वेळ आई-वडिलांवर आली आणि संगणकाच्या पडद्यापलिकडचं कितीतरी मोठं जग
संपूर्ण कुटुंबासाठीच खुलं झालं.

आपल्या घरातल्या एखाद्या वयस्कर आजी किंवा पणजीला, परदेशात असलेल्या तिच्या नातवाच्या किंवा पणतुच्या सगळ्या बाललीला जेव्हा संगणकावर प्रत्यक्ष बघायला
मिळतात,तेव्हा अहो आश्चर्यम चा भाव तिच्या चेहऱ्यावरुन काही केल्या लपत नाही. याच्या अगदी विरुद्ध,त्याच घरातल्या साधारण दहा वर्षांच्या मुलाला सुद्धा विकीमॅपियावर जाऊन त्याच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये असलेलं अफ्रिकेमधलं एखादं ठिकाण लोकेट करणं आणि तिथल्या भौगोलिक रचनेचा एरियल व्ह्यू घेणं यात काहीच आश्चर्य वाटत नाही. त्याच्या दृष्टीने ही गोष्ट घरामध्ये टि.व्ही. किंवा फ्रीज असण्याचइतकीच स्वाभाविक असते.

कॅनडामध्येच जन्म झालेला, शिक्षण ही तिथेच घेणारा 9 वर्षांचा माझा भाचा जेव्हा पुण्यामध्ये येतो, तेव्हा पुण्यामध्येच जन्म झालेला आणि पुण्यामध्येच शिक्षण घेणारा माझा 9 वर्षाचा अजून एक भाचा त्याच्याशी सहज संवाद साधू शकतो. त्याच्या करिता कॅनडाचं अप्रूप आजिबातच नसतं. ते दोघेही सारख्याच माहितीच्या आधारे फॉर्म्युला वन रेस बद्दल, हॅरि पॉटरबद्दल, अमेरिकन आयडॉलबद्दल, किंवा फुटबॉलबद्दल सहजरित्या बोलू शकतात.

काय म्हणणार आपण या प्रक्रियेला? सपाटीकरण? सपाटीकरण - flattening- हा शब्द अलिकडच्या काळात बर्याचवेळा वापरला गेला, थॉमस फ्रीडमन चं world is flat प्रसिद्ध झाल्यापासून. पण वर सांगितलेली उदाहरणं बहुधा या सपाटीकरणाच्या पलिकडे जाणारी आहेत. इथून-तिथून सगळं सारखंच असणं ही प्रगती म्हणायची की दुसरं काही? आपण आपल्या घरात बोलतो ते विषय आणि जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये एखाद्या कुटुंबात बोलले जाणारे विषय हे सारखेच आहेत. मनोरंजन, फॅशन, सौदर्यबुद्धी, खेळ, तंत्रज्ञान या सर्व बाबतीत या कुटुंबाचे असणारे प्रेफरन्सेस सुद्धा सारखेच आहेत. हे का आहे? हे कसं झालं? हे चांगलं आहे का?

सध्याच्या जगाचा विचार केला, तर ज्या प्रगत किंवा विकसनशील देशांबद्दल आपण बोलतोय, ते देश हे राजकीय स्वातंत्र्य केव्हाच मिळवून बसलेत. त्या देशांमध्ये असणारा,
वेल-टू-डू असा मोठा वर्ग स्वतःची विचारधारा सहजपणे संगणक नावाच्या साधनाकडे देऊन मोकळा झालेला दिसतो. ही गुलामगिरी नाही. ही स्वखुशीने स्वीकारलेली बांधिलकी
आहे. त्यामुळेच जगभर दररोज येणाऱ्या विविध प्रकारच्या अपडेटेड माहितीने स्वतःचा संगणक कामात ठेवण्याच्या मागे सर्व जण लागलेले आहेत. जगामध्ये येणारी लेटेस्ट
ऑपरेटिंग सिस्टीम आपल्या संगणकावर आणण्याच्या मागे लागलेले आहेत. मग जगातल्या विचार करण्याची क्षमता असणाऱ्या प्रत्येक घरामध्ये अशी एकच एक सारखीच
ऑपरेटिंग सिस्टीम असेल, तर बोलण्याचे विषय, खाण्याच्या सवयी, वागण्याचे मॅनर्स, लिहीण्याची भाषा यामध्ये विविधता येणार कशी?

अशा अनेक गोष्टींमध्ये एका व्यक्तीचं आणि त्या अनुषंगाने एका समाजाचं म्हणून असणारं वेगळेपण या सगळ्यामुळे हरवलंय.

अगदी माहितीतली, जवळची उदाहरणं घेऊयात. आपलं हस्ताक्षर किंवा आपली स्वाक्षरी ही अगदी आपली स्वतःची अशी ओळख असते. आपलं अक्षर हे फक्त आपलं असतं.
दुसरी व्यक्ती कितीही प्रयत्न केली तरी तंतोतंत आपल्यासारखं हस्ताक्षर काढू शकत नाही. आता, आय.टी.मध्ये काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला जाऊन विचारा, की हातामध्ये पेन घेऊन कागदावर, स्वतःच्या अक्षरात लिहून त्यांना किती वर्ष झाली? आज मला स्वतःला सुद्धा स्वतःचं अक्षर ओळखता येत नाही. कारण माझं अक्षर मला फक्त Arial, Tahoma, Times New Roman मध्येच बघायची सवय झाली आहे. आणि मग Arial, Tahoma, Times New Roman तर जगातल्या कोणाही व्यक्तीकडे असतात. सपाटीकरणाची ही अगद अगदी मूलभूत अशी सुरूवातच नाही का?

अक्षरानंतर येते, ती भाषा आणि भाषेमधून तुम्ही मांडता ते विचार. आजकाल सगळंच cool असतं. आपल्या भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचं वर्णन करणं तर सोडाच पण जगाच्या भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचं म्हटलं तरी
Controlled language वापरावी लागते. आय.टी.क्षेत्रामध्ये मी टेक्निकल रायटर म्हणून काम करते. लिखाणाची आवड या एका प्रेरणेने या क्षेत्रामध्ये गेले, तेव्हा मला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं, की आपल्याकडे असलेली शब्दसमृद्धी हा, टेक्निकल रायटर म्हणून काम करताना गुण म्हणून गणला जाणार नाही. पण असंच होतं.
एखादी गोष्ट युझर ला समजावून सांगताना निरनिराळे शब्द वापरणं हे कसं अयोग्य आहे, हेच मला शिकवलं गेलं. आणि याचं कारणं असं, की ज्या एका सॉफ्टवेअर बद्दल मी
लिहीते आहे, त्याच्या इतर काही पैलूंबद्दल इतर अनेक लेखक लिहीत आमच्या वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये लिहीत असतील. त्या प्रत्येकाने आपापल्या शब्दबळानुसार एकाच
गोष्टीचं वर्णन करायला निरनिराळे शब्द वापरले, तर त्या लिखाणाचं भाषांतर करताना मशीन गोंधळून जाईल. (हो, बरोबर! मशीनच म्हणते आहे मी. कारण आमच्याकडे पहिलं भाषांतर मशीन करतं आणि मग ते बरोबर आहे की नाही, हे एखादा भाषातज्ज्ञ तपासतो.) तर, त्या मशीनचा गोंधळ होऊ नये, म्हणून आम्ही केवळ आमच्या डिक्शनरी मध्ये दिलेलेच शब्द वापरुन जे लिहायचं ते लिहीतो. आहे की नाही गम्मत.सपाटीकरणाचा अजून एक पैलू!

फोनवर बोलण्याच्या पद्धती, एकमेकांशी इ-मेल मधून संवाद साधण्याच्या पद्धती, एकमेकांशी फोनवर बोलण्याच्या पद्धती सगळं सगळं सपाट करण्याच्या मागे जो तो लागला आहे. माझ्या मॅनेजरने माझ्य़ा चांगल्या कामाचं कौतुक करण्यासाठी "keep up the good work!" अशीच्या अशीच फ्रेज वापरली पाहिजे.मग तो मॅनेजर भारतात बसणारा असो किंवा अमेरिकेत. एखादं काम नीट होत नसेल, तर त्याचं वर्णन करताना जगाच्या कोणत्याची कोपऱ्यातल्या आय.टी. व्यावसायिकाने "we need put a process in place" असे शब्दप्रयोग खरायला हवेत. आपण किती बिझी आहोत, हे दाखवत दाखवत कोणत्याही मीटिंगला जाताना एखादा मॅनेजर "I need to do a hardclose at 4.30" असं म्हणाला नाही तरच नवल. "work sucks!", "it has to be done asap", what is the eta (expected time of arrival) for this?", "i am on pto (personal time off)" हे सगळं असंच्या असंच सगळीकडे बोललं जातंय... सपाटीकरणाचा एक भाग म्हणून!



टाईम झोन्स, भौगोलिक मर्यादा, सांस्कृतिक भिन्नता, आर्थिक स्तरांमधला भेद या सगळ्याच्या पलिकडे जाऊन ही सपाटीकरणाची प्रक्रिया वेग घेते आहे. आता हे वेग अंगावर येऊ लागला आहे. टेक्नॉलॉजी, ट्रेड, ट्रॅव्हल, आणि टेलिव्हिजन...आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेल्या या चार "T"मुळे वेग घेणारी ही प्रक्रिया. एडवर्ड
हॉल नावाच्या एका मानववंशशास्त्रज्ञाने सर्वप्रथम "संदर्भ-समृद्धता" या विषयावर त्याच्या "The Silent Language and The Hidden Dimension" या पुस्तकामध्ये लिहीलं आहे. त्याच्या मते, कोणताही समाज हा "उच्च संदर्भ-समृद्ध" किंवा "नीच संदर्भ-समृद्ध" असू शकतो. ही संदर्भ समृद्धता येते
वेगळेपणामधून. अशा समृद्ध समाजामध्ये, भाषेमधून व्यक्त होणारा अर्थ हा केवळ उच्चारांमधून आलेला नसतो. त्याला बराच मोठा संदर्भ असतो आणि तो संदर्भ समजल्याखेरीज ती भाषा किंवा तो शब्दही समजून घेणं शक्य नसतं. एडवर्डच्या या संकल्पनेच्या आधारे म्हणायचं, तर भारतीय समाज हा संदर्भ-समृद्ध होता.सपाटीकरणाच्या या प्रक्रियेमुळे आपण या संदर्भ-समृद्धतेपासून दूर तर जात नाही? थोडासा अजून विचार करुयात, पुढच्या बुलेटिन बोर्ड मध्ये.

No comments: